वेंगुर्ले : ऑलिव्ह रिडले जातीची कासवे हा सागरी अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक. अनेक कारणांमुळे ही कासवे दुर्मिळ होत चालली असल्याचे लक्षात घेऊन काही सजग नागरिकांनी त्यांच्या संवर्धनाचे शिवधनुष्य हाती घेतले. या कार्याचे परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता दिसू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास येथे भाऊ काटदरे आणि मित्रमंडळींनी गेली काही वर्षे कासव संवर्धनाचे काम जोमाने सुरू केले आहे. आता त्या कामात सिंधुदुर्ग पॅटर्नही तयार झाला आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारा हे आता प्रमुख कासव संवर्धन केंद्र बनले असून, सुहास तोरस्कर या कासवमित्राने कासव संवर्धनाचा जणू वसाच घेतला आहे. त्याचबरोबर देवगड तालुक्यात तांबळडेग समुद्र किनाऱ्यावरही गेली अनेक वर्षे हे काम निसर्गमित्र मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. यामुळे दुर्मिळ अशा ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले आणि देवगड समुद्रात प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले, ग्रीन तर्टेल आणि हॉक्सबिल या जातीची कासवे आढळून येतात. गेल्या १५-२० वर्षांपासून ऑलिव्ह रिडले जातीची कासवे वेंगुर्ले आणि देवगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येत आहेत; पण स्थानिक नागरिकांकडून या अंड्यांचा खाण्यासाठी वापर होत होता. तसेच कुत्रे आणि अन्य जनावरांपासूनही या अंड्यांना धोका होता. त्यामुळे या कासवांच्या संख्यावाढीवर निर्बंध आले होते.
ऑलिव्ह रिडले कासवे म्हणजे सागरी अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहेत. ही कासवे समुद्रातील विविध घटकांवर अन्नासाठी अवलंबून असतातत आणि शार्कसारखे मासे या कासवांना खाऊन आपली उपजीविका करतात. त्यामुळे कमी होत चाललेल्या या कासवांचे संवर्धन होणे गरजेच होते. त्यासाठी वेंगुर्ले तालुक्यात वायंगणी आणि देवगड तालुक्यात तांबळडेग येथे कासव संवर्धनाचे प्रयत्न सुरू झाले. याचा पहिला प्रयोग सुमारे पंधरा वर्षांपूर्वी तांबळडेग येथे सागर मालडकर आणि त्यांच्या टीमने यशस्वी केला. हेच काम वायंगणी किनाऱ्यावर गेल्या काही वर्षांपासून सुहास तोरस्कर आणि मंडळी करत आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून वायंगणीमध्ये कासव जत्रेसारखे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने पर्यटनदृष्ट्याही कासव संवर्धनाला महत्त्व आले आहे.
१३२ पिल्ले परतली स्वगृही
देवगड तालुक्यातील तांबळडेग समुद्रकिनारी तील निसर्गमित्र मंडळाच्या वतीने शुक्रवारी (२४ मार्च) पहाटे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या १३२ पिल्लांना समुद्रात सुखरूप सोडण्यात आले. त्या वेळी वन्यजीव अभ्यासक प्रा. नागेश दप्तरदार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जगदीश मालडकर, सागर मालडकर, दिनेश धावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.